नदी जगलेला माणूस
नदी जगलेला माणूस
नदी जगलेला माणूस आमच्या घरात होता. आमचे बाबा. रोज संध्याकाळी
घरी येताना त्यांची पावलं नदीतून भिजून यायची. अंगात पांढरा पायजमा. मळकट सुळक्यात
कळण्याची भाकर ठेचा. खांद्यावर गडायकाठी. तरट लावलेले बाटली. डोक्याला गुंडाळलेली
छापी. पायात टायरसोल चप्पल हा बाबांचा नित्य पेहराव. ते लोकांना सांगायचे श्रीकृष्णाने
यमुनेच्या काठी गुरं राखली. त्याची परंपरा आम्ही चालवतो आहे. बाबांचे जन्मनाव माधव.
हेही कृष्णाचेच नाव. पण माधव हे नाव केवळ
त्यांच्या आणि आमच्या शाळेच्या दाखल्यावर तेवढे होते. आख्य गाव त्यांना ओळखे काळू
या नावाने. काळू हे कोळीचा अपभ्रंश असावं. किंवा त्यांच्या रंगामुळे ते काळू झाले
असावेत. त्यांचे डोळे तपकिरी पाणीदार होते. नदीसारखे. त्यांची कधीच कुणाला भीती
वाटत वाटली नाही. गावातले सानथोर त्यांना ओळखायचे. त्यांच्याशी कोणाचेही वैर
नव्हतं. नदीसारखंच त्याचं मनही निर्मळ
होतं. त्यांचं अर्धाधिक आयुष्य सालदारकीत गेलं. उरलेलं आयुष्य नदीकाठी. गुरांमागे.
त्यांना नदीची भाषा कळायची. नदीचं पुस्तक त्यांना तोंडीपाठ होतं. नदीची गती, नाद, लय,
खोली अशा बारीकसारीक नोंदी त्यांच्याकडे असत. उगमापासून संगमापर्यंतची वाघूर
परिक्रमा त्यांनी केलेली होती. झीरपटपासून मेयाच्या डोहापर्यंत ते गव्हारं घेऊन
जात. वाघनये, पाचोटी, भाटी, पाभे या नदीकाठच्या रानात त्यांचा हिवाळा निघायचा.
पुराच्या गाळात उगवलेलं कोवळं लुसलुशीत
गवत खाऊन ढोरं टम्म फुगायची. उन्हाळ्यात कायभुईच्या रानात उलंगती झालेली असायची.
मग सारे ढोरकी आपापलं गव्हारं सकाळी नदीवरून पाणी दाखवून कायभुईत जायचे. उन्हं
उतरू लागलीत की एक एक करत पुन्हा नदीवर जमायचे. सातपायऱ्यांजवळ सगळे ढोलकी जमायचे.
सुकाबुवा, विठाबुवा, शांताभावजाय आणि बाबांचा घरोबा होता. हे चारही ढोरकी दिवाळीला
दिवटी काढायचे. त्यांची तयारी नदीवर चालायची. दिवटीसाठी लागणारी सामग्री एकमेकांना
वाटून घेत. चौथ्या आणि पाचव्या दिवसाची दिवटी मोठी असायची. नागांच्या फणा बनवायला
लागणारी लव्हाळी आणि सोट नदीतच मिळे. हे काम बाबा मोठ्या आनंदाने करत. एरवीही कधी
आंबाडीचा दोर, कधी कुऱ्हाड-फावडा-कुदडीसाठी दांड बनण्यात ते व्यस्त असत. म्हशी
नदीत शांत बसलेल्या तर काठच्या पाषाणावर गायी वासरे रवंथ करत पहूडलेली असायची. मासे
आणि खेकडे पकडून तिथेच भाजून खायचे. या जुन्या दगडी सातपायऱ्यांनी गावातल्या
गुरख्यांच्या कितीतरी पिढ्या पाहिल्या. वरच्या डोंगराची सावली नदीच्या पात्रात पडली की ढोरं घराच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होत. बाबा जवळच्या आसराच्या
झिऱ्याजवळ जावून ओंजळीओंजळीने पोटभर पाणी पीत. नदीतल्या वाहत्या धारेचं पाणी तोंडावर
घेत. नदीला नमस्कार करत. मग पाण्यात बसलेल्या म्हशींना घे घे असा आवाज देत उठवायचे.
हा इलाज संपला की मग ते हातात खडे उचलून त्यांच्या शिंगावर भिरकवत. बाबाचा निशाणा
कधी चुकायचं नाही. शिंगावर दगडाचा आपटण्याचा आवाज झाला की म्हशी पटापट बाहेर येत.
ढोरांच्या खुरांनी उठलेले धुळीचे असंख्य लोट नदीचा परिसर झाकून टाकतात.
दिवेलागणीला मालकाच्या वाड्यापर्यंत ढोर पोहोचून बाबा घरी यायचे.
जेवणं आटोपले की आम्ही भावंडं बाबांना गोष्टी सांगा
म्हणून तगादा लावायचो. त्यांच्याकडे गोष्टींचा हंडा होता. त्या हंड्यात छोट्या-मोठ्या थैल्यांमध्ये गोष्टी बांधलेल्या होत्या. काही
गोष्टी मूठभर तर काही गोष्टी दोन-दोन दिवस चालायच्या. या गोष्टी नदीसारख्या झरझर
वाहत राहतच असाव्या असे वाटे. रानातल्या, नदीकाठच्या त्यांच्यासोबत घडलेल्या
हकीकती सांगताना बाबा पुन्हा नदीकाठ भटकून यायचे. ‘एका तपस्वी साधूने गावकऱ्यांना
दिलेला शाप’ ही गोष्ट ते बऱ्याचदा सांगायचे. ही गोष्ट सांगून झाली की आम्ही भीतीने
शांत होवून जायचो. बाबाही अस्वस्थ होत असत.
बाबा जेढारबुवाला मानायचे. कोणी भूता-खेताला घाबरलं किंवा
वाईट स्वप्न पडत असेल किंवा आपल्या मागची बलाय जावी लोकं या जलदेवतेला पुजत.
कुणाला विंचू-गोम-सापाने चावा घेतला बाबा त्याचं विष मंत्रवून काढत. धामण चावली तर
तोंडात लव्हाळी चावत सात वेळा नदी पार केली की विषबाधा होत नाही हा त्यांचा शोध
होता. नदीतल्या भोवऱ्यात अडकलेली म्हैस ते एकट्याने काढून आणत. अचानक आलेल्या जीभेत
वाहून गेलेल्या अनेकांचे प्राण त्यांनी वाचवलेत. केवढाही पूर आलेला असला तरी बाबा
आपले गुरं पाण्यात ढकलून त्यांच्या शेपटी धरून नदी पार करायचे. खुपदा जीवावर
बेतणारे प्रसंग त्यांनी अनुभवले. नदीनं त्यांचा कधी घात केला नाही.
|
Comments
Post a Comment